विनायक पवार..
पालघर – पालघर व आसपासच्या परिसरात शुक्रवारी पहाटेपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. ऐन हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने मच्छिमारांनी सुकण्यासाठी वाळत घातलेली मच्छी भिजल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने या नुकसानीबाबत त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.
बांबू ‘वरणी’ वर सुकण्यासाठी ठेवण्यात येतात मासेमासेमारी करायला समुद्रात जाणाऱ्या मच्छिमारांकडून लहान-मोठे मासेविक्रेते टोपलीच्या भावाने मासे विकत घेतात. एक विक्रेता साधारण दीड- दोन हजारांचे मासे विकत घेतो. हे मासे प्रकारानुसार वेगवेगळे करून रात्रभर बर्फात ठेवले जातात आणि सकाळी ६-७ वाजता समुद्रकिना-यावरच्या बांबूंच्या ‘वरणी’वर सुकवण्यासाठी ठेवतात. काही दिवसांनी मासे सुकले की पुढे वर्षभर ते टिकतात आणि कधीही विकता येतात. बोंबील, मांदेली, कोलबी, सुकट, करंदी, लहान पालेट, वाकटी-पाट्या, लहान शिंगाडा असे सर्वच मासे सुकवले जातात. अर्थात, बोंबलाचे प्रमाण त्यात सर्वाधिक असते.
डहाणू खाडी, नवापूर, दांडी, उच्छेळी या भागात बोंबील मोठय़ा प्रमाणात सुकवला जातो. संततधार पावसाचा फटका बसला असून पालघर जिल्ह्यत जवळ पास दोन कोटींचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तवली जात आहे. सुक्या मासळीचे माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱ्या धाकटी डहाणू ते उच्छेळी, दांडी परिसरात पडत असलेल्या संततधार पावसाचा मोठा फटका सुक्या मासळीला बसला आहे. या ठिकाणी सुके बोंबीलसह अन्य सुक्या मासळींचे उत्पादन केले जाते आणि त्यासाठी कित्येक कोटींची उलाढाल केली जाते. मात्र पावसाचा मोठा फटका बसला असून तीन कोटींचे नुकसान झाल्याची माहिती मच्छीमारांनी दिली.
या काळात सुक्या बोंबीलला 400 रुपये किलो तर सुक्या मांदेलीला 200 रुपये किलो आणि सुकट 300 रुपये किलो असा भाव मिळतो. पावसाळा संपल्याने ऑक्टोबरनंतर मासळी सुकवण्यात येते. या काळात मच्छीमारांना ३० ते ४० हजारांचे उत्पन्न मिळते. मात्र गेल्या 5 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने त्याचा फटका सुक्या मासळीला बसला आहे. दिवाळीच्या तोंडावरच मोठे नुकसान झाल्याने मच्छीमार चिंतेत आहेत.
डहाणू येथे ९० मोठय़ा आणि १६० लहान मासेमारी बोटीतून मासेमारी व्यवसाय चालतो. एका बोटीवर १५ ते २० कुटुंबे उदरनिर्वाह करतात. मागच्या वर्षी या हंगामात एक बोट जवळपास १० लाखांचे उत्पन्न घेत होती. मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन २० टक्क्यांनी घसरले आहे. त्यामुळे जेमतेम दोन लाखांचे उत्पन्न मिळेल, अशी परिस्थिती असल्याचे मच्छीमारानी सांगितले.
डहाणूत बोंबील, कोळंबी, मांदेली, जवळा हे मासे मोठय़ा प्रमाणात सुकवले जातात. या चार महिन्यांत एका मोठय़ा बोटीतून सात ते आठ टन उत्पादन होते, तर लहान बोटीतून एक ते ३ टन उत्पादन होते. डहाणू परिसरात जवळपास एक हजार टन उत्पादन होते. या दिवसात खारे वारे जोरात वाहत असतात. त्यामुळे मासे चांगले सुकतात. या दिवसांत भल्या पहाटे तसेच सायंकाळच्या वेळी येथील खाडीवर कोळी महिलांची मासे सुकवण्यासाठी तसेच सुकवलेले मासे भरण्यासाठी लगबग पाहायला मिळते. मात्र पावसाचा फटका बसल्याने मासे सुकवण्यात अडचणी निर्माण झाली असल्याने
पावसाच्या पाण्यामुळे बोंबील कुजत असून प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी मच्छिमारांनी केली आहे.