विनायक पवार –
पालघर जिल्ह्यातील वाडा खडकोना गावात गेल्या वीस वर्षापासून बेकायदेशीरपणे दगड खदान सुरू आहे.शासनाची कोणतीही परवानगी न घेता वीना परवानगी सुरू असलेल्या या खदानीतून अवैधरीत्या दगड काढण्यात येत असून स्वामित्वधन चुकवून महसूल विभागाला आत्तापर्यंत कोट्यावधी रूपयांचा चूना लावण्यात आल्याची शक्यता आहे.त्याचप्रमाणे या खदानीमुळे पर्यावरणाची देखील मोठ्या प्रमाणात हानी होत आहे.
वाडे गावात जय अंबे ढाबाच्या मागे असलेली ही खदान मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी जवळ आहे.जवळपास आठ एकर जागेवर असलेल्या या खदानीतून गेल्या वीस वर्षापासून अव्याहतपणे गौणखनिज काढले जात असून आत्तापर्यंत पालघर महसूल विभागाची कोट्यावधी रूपयांची रॉयल्टी बुडवून लाखो ब्रास दगडांचे बेकायदेशीर उत्खनन केले गेले असल्याची शक्यता आहे.या खदानीच्या लगत अगदी १०० फूट अंतरावर आदीवासी पाडा असून खदानीतील दगड फोडण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या जिलेटीनच्या स्फोटांनी या आदीवासी पाड्यातील लोकांच्या घरांना तडे गेले असून स्फोटानंतर उडालेले दगड थेट घराच्या छपरावर पडत असल्याने नागरीक अक्षरक्ष भीतीच्या छायेखाली जगत आहेत.
वाडे गावातील गट क्र.७५ आणि ७६ मध्ये सुरू असलेल्या या अवैध खदानीविरोधात स्थानिक नागरीकांनी वाडे गावातीलच एका राजकीय प्रभावशाली व्यक्तीने खदानीसाठी आपली ८ एकर जमीन बळकावून भूमीहीन केले असल्याबाबतची तक्रार २०१७ आणि २०२० साली पालघरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.मात्र या तक्रारीनंतर कोणतीही कारवाई न झाल्याने ही अवैध खदान बीनबोभाट सुरू असून जवळपास ५० फुटांपेक्षा अधिक खोल खोदकाम करण्यात आले आहे.या खदानीसाठी महसूल,वन,खनीकर्म आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोणतीही आवश्यक परवानगी घेतल्याचे दिसून येत नाही.त्याचप्रमाणे पालघर जिल्हा खाणकाम आराखड्यात देखील या खदानीचा समावेश नसून आवश्यक पर्यावरणीय परवानगी देखील नसल्याचे पुढे आले आहे.
गेल्या वीस वर्षापासून सुरू असलेल्या या अवैध खदानीतून दगडांचे बेकायदा उत्खनन आणि डंपरमधून वाहतूक सुरू असताना महसूल विभागाच्या तलाठी सजा नांदगाव आणि बोईसर मंडळ अधिकारी नेमके करतात काय असा संतप्त सवाल वाडे गावातील स्थानिक नागरीकांनी केला आहे.या अवैध खदानीचे मोजमाप करून मालकाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा व कोट्यावधी रुपयांची रॉयल्टी बुडविल्याप्रकरणी जबर दंड वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कोट-१
मौजे वाडे ता.पालघर येथील सर्व्हे क्र.७६ जमिनीवर शासनाची कोणतीही आवश्यक परवानगी न घेता गेल्या २० वर्षांपासून बेकायदा दगड खदान सुरू आहे.ही जमीन सामाईक असून त्यातून १४ आदिवासी खातेदारांना दमदाटी तसेच फसवणूक करून बेदखल केले आहे
.सदर बेकायदा खदानीचे मोजमाप करून मालकास जबर दंड आकारून पर्यावरणीय नुकसानीबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.
विष्णू उराडे
स्थानिक ग्रामस्थ,वाडा खडकोणा
कोट-२
मौजे वाडे ता.पालघर गावातील सर्व्हे क्र.७५ व ७६ या जागेवर दगड खदानीतून बेकायदा उत्खनन सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे.या ठिकाणी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून अहवाल तयार केला आहे.त्याचप्रमाणे महसुल,सार्वजनिक बांधकाम व भूमी अभिलेख विभाग यांच्या अधिकारयांकडून जागेची संयुक्त पाहणी करून मोजमापाच्या आधारे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
सुनील शिंदे
तहसीलदार, पालघर